बुधवार, १० मे, २०१७

जबलपूरच्या वाटेवर..... भाग १

नमस्कार
बऱ्याच दिवसांचा (खरंतर वर्षांचा!!) एक plan डोक्यात घोळत होता. पण प्रत्येक वेळेस सुट्यांचा प्रॉब्लेम किंवा कोणाची तरी अडचण येत येत  मागेच पडत होतं. परंतु म्हणतातनं कि वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही, अगदी तसंच झालं. या वेळेस सगळ्यांचं पक्कं झाला आणि आमचा जबलपूर च्या  plan वर शिक्का उमटला. ३० एप्रिल आणि १ मे असा सुटीचा बेत ठरवून आम्ही चौकडी निघालो जबलपूर ला जायला. मी, हृषीकेश, वैभव सर आणि कौस्तुभ सर असे चौकडीचे  सदस्य होतो.
 ३० च्या सकाळी सुरु झाला वर्धा ते जबलपूरचा प्रवास. निघाल्यावर  पहिले भेट घेतली ती रामटेकच्या रामरायाची. भेट धावतीच झाली कारण पोहोचे पर्यंत मंदिर बंद होण्याची वेळ झाली होती. दर्शन आटपून व रामभक्त वानरांना प्रसाद देऊन आम्ही पण आमचा पोटोबा शांत करण्यासाठी गड पायथ्याशी असलेल्या दुकानांमध्ये कच्चा चिवडा आणि थंड सरबत घेतलं आणि लागलो पुढच्या प्रवासाला.
संपूर्ण रस्त्याचे काम सुरु आहेत त्यामुळे प्रवासाला वेळ लागत होता. गाडीत पूर्ण वेळ धिंगा घालणं सुरु होतं. मस्त वेळ जात होता. रस्त्यात toll  पण बरेच होते, त्यामुळे जीव मेटाकुटीला आला होता. 
महाराष्ट्र सोडलं आणि भारताच्या हृदयात प्रवेश केला. सुंदर रस्ते , बरंचसं काम पूर्ण झालेलं. मनात अचानक स्वर उमटले "हि वाट दूर जाते स्वप्ना मधील गावा....".





आता भुकेची वेळ झाली होती. आणि भुकेची जाणीव कावळे ओरडून करून देत होते. सिवनी येताच आम्ही छान हॉटेल  स्थानिक लोकांना विचारात शोधून काढलं आणि जठराग्नी शांत केला. हसी-मजाक करत मस्त जेवण फस्त केलं मात्र पुढच्या प्रवासात आम्ही सुस्त झालो. सर्वांनी एक एक डुलकी 
घेऊनच घेतली. सगळे सुस्तावले असल्यामुळे  energetic होण्यासाठी थांबलो. recharge होताच पुन्हा प्रवासाचा आरंभ झाला. आता थोडं कंटाळून गेलो होतो, तोच नर्मदा मैयाचे प्रथम दर्शन घडले आणि सर्व जण तरतरीत झालो. माझं तर स्वप्नचं पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. विशाल पात्र आणि त्यावरचे मोठे मोठे पूल मनाला भुरळ घालत होते. संध्याकाळी जबालपूरला गंगा मैयासारखीचं नर्मदा माईची आरती होते हे ऐकलं होतंच आणि आता ७.०० वाजले असल्यामुळे आरतीचे वेध लागले होते. रोज संध्याकाळी ७.३० वाजता गौरी घाटावर माईच्या आरतीचा सोहळा संपन्न होतो. स्थानिक तसेच पर्यटक मोठया प्रमाणात या घाटावर येऊन आरतीचा दिव्य अनुभव घेतात. नर्मदेच्या उत्तर तटावर या आरतीचे आयोजन होते. घाट सुंदर आणि प्रशस्त बांधलेला आहे. ज्या ठिकाणावरून आरती करतात तिथेच बाराही ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकात्मक पिंडींची स्थापना करण्यात आली आहे. पूजा करणाऱ्या पंड्यांच्याच मागे आम्हाला जागा मिळाली त्यामुळे संपूर्ण सोहळा अगदी व्यवस्थित अनुभवता आला. नर्मदेची पंचोपचार पूजा करण्यात येते, त्यानंतर नर्मदा अष्टकाचा पाठ होतो आणि सुरुवात होते नर्मदा माईच्या आरतीला " ओम जय जगतानंदी, मैया जय आनंद कंदी . . . . . . . . ".




घाटावरचा बहुतेक लोकांना पण आरती ओवाळण्याची संधी मिळते, आणि त्या अभूतपूर्व आरती ओवाळण्याचा  आम्हाला पण लाभ मिळाला, भाग्यच.. . . . त्यानंतर नर्मदेच्या पाण्यात आम्हीपण दीपदान केलं. तो स्वर्गीय सोहळा  पाहून "रोमांचाची फुले लगडली माझिया देहद्रुमा " अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सुरूझाला photo session.

दिवसभाऱ्याच्या प्रवासाचा थकवा जाणवायला लागला होता आणि विश्रांतीची गरज पण होती. थोडी चौकशी करून आणि इंटरनेट गुरु च्या मदतीने हॉटेल्स शोधण्याच्या मोहिमेला आरंभ केला आणि दोन ते तीन हॉटेल्स पाहूनच थांबलो कारण अजून शोधण्याची इच्छाच नव्हती.  Fresh होऊन रात्रीचं जेवण आटपून हॉटेल ला परत आलो. गप्पांचा थोड्यावेळ फड रंगला असतांनाच निद्रादेवीची अति  तीव्रतेने आठवण केल्यामुळे गार वातावरणात दुसऱ्यादिवसाचे plan आखात  झोपलो.