बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

अपरिचित वारसा (आमनेर किल्ला)

काळाच्या उदरात असंख्य आठवणी, असंख्य गोष्टी आणि असंख्य वास्तू सामावलेल्या असतात. त्यापैकी काही परिचित असतात तर काही गोष्टी अपरिचितच राहतात. अशीच एक अपरिचित वास्तू जी इतिहासाचा अमूल्य ठेवा जपून आहे, ती म्हणजे "आमनेर किल्ला"........

आमनेर किल्ला हा भुईकोट प्रकारचा किल्ला असून, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात, तापी आणि गडगा (पूर्वीचे नाव गर्ग नदी ) या नद्यांच्या संगमावर आहे.

किल्याचे स्वरूप:
एक एकर परिसरात हा किल्ला पसरलेला असून, संगमावरच्या टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची साधारण ३०० मीटर. किल्ला हा भाजलेल्या विटा आणि रेतीमिश्रित चुन्याच्या जुडाईपासून बनवलेला आहे. किल्ल्याला चार मुख्य बुरुज आणि प्रत्येक  तटबंदीच्या मध्यभागी एक बुरुज असून, बुरुजांसाठीसुद्धा विटा आणि मातीचाच वापर केलेला आहे. किल्ल्याला एकच सलग तटबंदी असून, तापी नदीच्या डाव्यातीरावर, तटबंदीच्या वायव्य दिशेला किल्ल्याचे दार आहे. किल्ल्याच्या आतील पश्चिम  बाजूला मशीद असून, किल्ल्याच्या आतील  बरेचसे अवशेष ढासळलेले आहेत. 
योगदान : जुन्या CP & Berar प्रांतातील मेळघाट परगण्यात या किल्ल्याचा समावेश होत असल्यामुळे तत्कालीन राजकारणात या किल्ल्याचे विशेष महत्व होते. स्वातंत्रसंग्रामातील तात्या टोपेंचा या किल्ल्याशी निकटचा संबंध. तसेच भिल्ल चळवळीतील महत्वाच्या तंट्याभिल्लवर नजर ठेवण्यासाठी आणि त्याचा विमोड करण्यासाठी, राजासिंगच्या नेतृत्वात या किल्ल्याचा वापर करण्यात आला. परंतु पुढे स्वातंत्रसंग्रामातील कोणीही या वास्तूचा उपयोग करू नये म्हणून १८५८ मध्ये इंग्रजांनी किल्ल्याची तटबंदी व बुरुज उध्वस्त केले आणि किल्ल्यातील चार तोफ पण काढून घेण्यात आल्या. 
मोडकळीस आलेला असून सुद्धा इतिहासाचा हा  मूक साक्षिदार  आपल्याच दिमाखात उभा राहून  काळाचे घाव सोसत आहे. 
(माहिती Amravati District Gazetteer, Vol. A, British Period वरून संकलित )

सचित्र आमनेर :

  वाटेत लागलेल्या सिपना नदीचे विहंगम दृश्य !!!!!!!! (पाणी खूपच कमी  होतं हो)


आमनेर किल्ल्याचा एक बुरुज व तटबंदी 

गडगा ( गर्ग ) नदी किनाऱ्यावरून दिसणारा आमनेर


 तापी नदी कडून असलेली तटबंदी व बुरुज


गडगा (गर्ग) नदीतील जल प्रवाह 


तापी नदी 



तापी- गडगा संगम आणि आमनेरचे प्रतिबिंब 



 मार्गात बसलेले कपिराज!!!!!


एखाद्या वयस्क तपस्यासारखा, जगावर सावली पांघरणारा वटवृक्ष


सातपुड्याच्या निसर्गकुशीत घेऊन जाणारी वाट !!!!!
                                          'ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा ........

धारणी हा आदिवासी बहुल परिसर, या परिसरात आदिवासी जीवनाचे विविध पैलू पाहायला मिळतात. यापैकी एक म्हणजे गोलादेव........ 
आदिवासी घरातील कोणी वडीलधारी माणसे मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ नदीपात्रातून पाषाण किंवा लाकूड आणतात, त्यावर मृतव्यक्तीचे प्रतीकात्मक अंकन करतात आणि असे पाषाण गावाबाहेरील एका झाडाखाली ठेवतात. याच स्मृतिस्थळाला म्हणतात गोलादेव ... 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा