बुधवार, २९ मार्च, २०१७

कालगणना..... भाग २


कालच्या भागात कालगणनेच्या पूर्वपीठिकेबद्दल जाणून घेतलं . शककर्त्यांनी निरनिराळ्या कालगणनांचा प्रारंभ आणि वापर केला. भारतात बऱ्याच विभिन्न  कालगणनांचा वापर केला जातो. त्यापैकी नित्य उपयोगात येणाऱ्या संवत्सरांचा या भागात आढावा घेऊयात..... 
भारतात सर्वदूर आणि सर्व स्तरातील लोकांकडून वापरण्यात येणारे प्रचलित असे "इसवी सन " अर्थात इंग्रजी कालगणना. हि कालगणना ज्युलियस सीझर ने सुरु केली. जानेवारीच्या पहिल्या तारखेस या सनाचा आरंभ करतात. हा इंग्रजी सन ख्रिस्ताच्या जन्मवर्षापासून मोजण्याची प्रथा आहे. 
त्यानंतर  भारतात वापरात येणारे संवत म्हणजे "विक्रम संवत ". उज्जयनीच्या विक्रमादित्य राजाने हि कालगणना  सुरु केली. हा संवत कार्तिक महिन्यापासून सुरु होतो. दिवाळीचा  पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हा या संवत्सराचा पहिला दिवस. विक्रमादित्याच्या राज्याभिषेकापासून या  संवताचा प्रारंभ करण्यात आला. सध्या विक्रम संवत २०७३ कीलक नाम सुरु असून पुढे कार्तिक महिन्यापासून २०७४ सौम्य नामक संवत सुरु होत आहे. 
त्यानंतर क्रम लागतो शालिवाहन संवताचा, महाराष्ट्रात प्रामुख्याने वापरात येणारा आणि धार्मिक कार्यक्रमात उश्चारल्या जाणारा हा संवत. पैठणच्या रणधुरंदर शालिवाहन राजाने  रानटी शकांच्या आक्रमक टोळ्यांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे हा संवत. या संवत्सराची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून करण्यात येते. यातील महिने हे चांद्र अमावास्यांत आहेत. वर्ष प्रतिपदेपासून म्हणजेच कालपासून शालिवाहन संवत १९३९, हेमलंबी नामक वर्ष सुरु झालेले आहे. 
हिजरी सन :- अर्थात मुस्लीम कालगणना 
हि कालगणना सर्व मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राष्ट्रांमध्ये वापरण्यात येते. हि कालगणना पूर्णताः चंद्र कालदर्शक गणना आहे.  या कालगणनेच्या प्रारंभाविषयी असं सांगतात कि " येमेनच्या अब्रहाने अरबांवर हल्ला केला. यात अरब विजयी झाले आणि याचं प्रतीक म्हणजेच हा हिजरी सन. या सनाची सुरवात होते ती मुहरम या महिन्यापासून, सध्या हिजरी सन १४३८-१४३९ सुरु आहे. 

जैन धर्मियांचे वीर निर्वाण संवत :
इसवीसनाच्या ५२७ वर्षांपूर्वी, दिवाळीचा दिवस हा महावीरांच्या महानिर्वाण दिवस मानला जातो. याच दिवसापासून या संवत्सराचा आरंभ मानला जातो. सध्या २५४३-२५४४ हे निर्वाण संवत सुरु आहे. 

यानंतर, सर्वात अर्वाचीन संवत्सर सुरु केले ते, महाराष्ट्राला ललामभूत असलेले , महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवशंभूंनी. छत्रपतींच्या राज्याभिषेकापासून महाराष्ट्रात छत्रपती संवत, शिव संवत किंवा राज्याभिषेक शक सुरु करण्यात आला. सध्या शिव संवत ३४३-३४४ सुरु आहे. 

हि सर्व संवत्सरे भारतातील विविध भागात उपयोगात आणली जातात. इतका प्राचीन आणि प्रचंड कालगणनेचा वारसा आपल्याला लाभला हे आपलं  भाग्य. सर्व भारतीयांनी किमान वर्ष प्रतिपदेला  तरी या वारस्याचे स्मरण करण्याचा संकल्प करूया...... 

 चैत्री नवरात्राचा आजचा दुसरा दिवस,  आदिशक्तीचे आणि श्री राघुनंदनाचे स्मरण करून आजची लेखमाला इथेच संपवतो.. 
वरदां पुत्रदां श्यामां द्रव्यदां दिव्यभोगदाम् । अन्नपूर्णां चिरंजीवीं ध्यायामि तुरजां हृदी॥
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा